मुंबई : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. आज दुपारी पाच वाजता या निवडणुकांसाठीचा प्रचार संपुष्टात येईल. त्यानंतर मंगळवारी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. मात्र, त्यापूर्वी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने बारामती, फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषेदची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली आहे. आता फलटण आणि महाबळेश्वर येथील मतदानप्रक्रिया अनुक्रमे २० आणि २१ डिसेंबर रोजी पार पडेल. जिल्हा न्यायालय निवडणूक प्रक्रियेबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा न्यायालयाने निकाल देण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी घेतला आहे.
बारामती नगरपरिषदेत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत होती. मात्र, ही प्रक्रिया पावणेतीन वाजताच बंद झाली होती. याशिवाय, उमेदवारी अर्ज भरतानाच्या प्रक्रियेत काही त्रुटी होत्या, यावर काहीजणांनी आक्षेप घेतला होता. न्यायालयाने भाजपच्या दोन उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख संपल्यानंतरही अर्ज भरण्याचे निर्देश दिले होते. तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावरील आरोपाबाबतही न्यायालयीन निर्णय प्रलंबित असल्याने निवडणूक आयोगाने वाद टाळण्यासाठी येथील निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.
महाबळेश्वर आणि फलटणनंतर बारामतीची निवडणूक देखील पुढे गेली आहे. निवडणूक आयोगाने तसे अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. बारामतीमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह सात प्रभागातील उमेदवारांविरोधात बारामतीच्या सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेचा निकाल सत्र न्यायालयाने दिला. ही याचिका न्यायालयाने फेटाळली. मात्र, नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार निवडणूक आयोगाने ज्या ठिकाणी याचिका दाखल केलेली आहेत. त्याची अपिलाची मुदत संपली नसल्याने ही निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार बारामतीतील नगराध्यक्षांच्या निवडणुकीसह काही प्रभागातील सात जागांचा विचार करून ही निवडणूक प्रक्रिया आता २० डिसेंबर रोज पर्यंत पुढे ढकलली आहे. साहजिकच नगराध्यक्षपदाचाही यामध्ये समावेश असल्याने बारामतीचे नगरपरिषदेचे मतदान थेट २० डिसेंबर रोजी घेतली जाणार आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदासह ज्या सात जागांसाठी सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
या नव्या प्रक्रियेनुसार ४ डिसेंबर रोजी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम मुदत १० डिसेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे आवश्यकतेप्रमाणे निवडणूक चिन्ह देण्याचा व अंतिम निवडणूक लढवणार्या उमेदवारांची यादी ११ डिसेंबर २०२५ रोजी जारी केली जाणार असून २० डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत मतदान होणार आहे. २१ डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल होणार आहे. नव्याने उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही.
यवतमाळ नगरपरिषद निवडणुकही पुढे ढकलली?
दरम्यान यवतमाळमधील दिग्रस पांढरकवडा आणि वनी येथील काही प्रभागांची ही निवडणूक लांबणीवर जाण्याची चिन्हे आहेत. याबाबत अद्याप निवडणूक आयोगाकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ज्या ठिकाणी तांत्रिक चुका झाल्या तेथे निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगानं नव्याने कार्यक्रम दिला असून आता निवडणुक २० डिसेंबरला होणार आहेत. निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडण्यामागे न्यायालयीन कारण असल्याचे समोर आले आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकार्यांकडून अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
नगरपालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज
नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी एकूण १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी सुमारे १३ हजार ३५५ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. या निवडणुकांसाठी ईव्हीएम मशीनचा व्यवस्था करण्यात आली असून त्यात १३ हजार ७२६ कंट्रोल युनिट आणि २७ हजार ४५२ बॅलेट युनिटची उपलब्धता करण्यात आली आहे.
राज्यातील २४६ नगरपरिषदा तर ४२ नगरपंचायतींच्या (एकूण २८८) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. २ डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे. तर मतमोजणी ३ डिसेंबरला सकाळी १० वाजता सुरु होणार आहे.